नवी दिल्ली – कठोर मानल्या जाणाऱ्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) 2019 या वर्षात देशात 1 हजार 948 जणांना अटक करण्यात आली. त्यातील 34 जणांना दोषी ठरवण्यात आले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे संबंधित माहिती दिली. द्रमुकच्या एका खासदाराने त्याविषयीचा प्रश्न विचारला होता. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राय यांनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनांशी संबंधित प्रकरणांवरून दिल्ली पोलिसांनी 183 जणांना अटक केल्याचे सांगितले.
आंदोलक शेतकऱ्यांविरोधात दाखल झालेल्या कुठल्या गुन्ह्यात देशद्रोहाचे किंवा यूएपीएचे कलम लागू करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत.
त्या आंदोलनाला आठ महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. मात्र, मोदी सरकार आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याच्या मुडमध्ये दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.