बारामती – आज जर महाराष्ट्रात निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडीचे 190 ते 200 आमदार आणि 34 ते 36 खासदार निवडून येतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सर्व्हे केल्यानंतर यावर खासदार सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. शहरातील आमराई परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुलांची पाहणी खासदार सुळे यांनी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक बिरजू मांढरे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, पुण्यासारख्या ठिकाणी सध्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयता आणि गॅंग हे माहित आहे. पण कोयता गॅंग हा शब्द काय आपल्याला माहित नाही. महिला रस्त्यात थांबून मला सांगतात आमच्या मुली शाळा, कॉलेजला जातात. आम्हाला काळजी वाटते. तुम्ही गृहमंत्र्यांची भेट घ्या.
यावर चर्चा करा. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी आहे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामाला फारसे यश आलेले दिसत नाही. राज्य शासनाचा अहवाल असे सांगतो की, सहा महिन्यांत महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. ही गंभीर बाब आहे.
बारामतीच्या निधींबाबत सुळे म्हणाल्या की, बारामतीला तर निधी दिलाच आहे. तो बारामतीकरांचा अधिकार आहे. मात्र, इतर तालुक्यांना उपाशी ठेवून बारामतीला निधी दिला, हे मला मान्य नाही. जेजुरी मंदिर आणि परिसर विकसित करण्यासाठी साडेचारशे कोटींचा निधी दिला आहे. सासवडला अडीचशे कोटींचा निधी दिला आहे. सर्वत्र सर्वांगीण विकास कसा होईल, याकडे अजित पवार यांनी सातत्य ठेवले आहे.