जयपूर – मैत्रिणीच्या घरात गुपचूप शिरताना पकडले गेल्याने खजील होऊन पळून गेलेला एक युवक पाकिस्तानात पकडला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कटुंबीयांनी दिली. त्याचा शोध घेण्याचे काम महिनाभर सुरू होते.
सीमा ओलांडून तो पकिस्तानात आल्याने सिंध पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचा दुजोरा पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाला कळवला आहे. आता त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बारमेर जिल्ह्यातील कुम्हारो का टिबा या गावातील गेमाराराम मेघवाल या 19 वर्षीय युवकाने गेल्या वर्षी चार नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला. बिज्रद पोलिसांत त्याच्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
हे कुटुंब पाकिस्तान सीमेच्या जवळच राहात आहे. त्यांचे नातेवाईक पाकिस्तानातील पबनी या गावात राहतात. त्यांच्याकडे जात असल्याचे सांगून हा युवक गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या नातेवाईकांनी तो पाकिस्तानात आल्याचे मान्य करत त्याला पोलिसांनी पकडल्याचा दूरध्वनी केला.
बिज्रद पोलिसांचे ठाणे अंमलदार जेठा राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमारारामचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. तिला भेटण्यासाठी चार नोव्हेंबरला तिच्या घरात घुसत असताना तिच्या कुटुंबीयांनी पकडले. ही बाब ते त्याच्या पालकांच्या कानावर घालणार असल्याचे सांगितल्याने घाबरून तो पकिस्तानात पळून गेला.
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या युवकाला परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, त्याला परत कधी आणता येईल याबाबत निश्चित कालावधी सांगण्यास असमर्थतता दर्शवली. पाकिस्तानी प्रशासनाने त्याबाबत प्रक्रिया सुरू केली असून पाकिस्तानातील कायद्याप्रमाणे त्याचे हस्तांतरण होईल, असे सांगितले आहे.