विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची शनिवारी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. विविध उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात बारा मतदारसंघात छाननीनंतर 189 उमेदवार आता निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत असून त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.
अकोले मतदारसंघातून छाननीमध्ये एक अर्ज अवैध ठरला. छाननीनंतर 6 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. संगमनेर विधानसभा मतदारसंघात 11 जणांनी 20 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीनंतर एक नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने आता रिंगणात 11 उमेदवारांचे 19 नामनिर्देशनपत्रे राहिली आहेत. शिर्डी मतदारसंघात 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
कोपरगाव मतदारसंघात 23 उमेदवारांचे 32 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 22 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून बाळकृष्ण दीक्षित यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. श्रीरामपूर मतदारसंघात छाननीनंतर 32 उमेदवारांचे 40 अर्ज शिल्लक राहिले आहेत. छाननीत 4 अर्ज अवैध ठरले. नेवासा मतदारसंघात एकुण 20 उमेदवारांचे अर्ज ठरले.
शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात 20 उमेदवारांचे 30 अर्ज प्राप्त झाले होते. राहुरी मतदारसंघात 12 अर्ज वैध ठरले. पारनेर मतदारसंघात 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. नगर शहर मतदारसंघात 17 उमेदवारांनी 21 नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. श्रीगोंदा मतदारसंघात छाननी प्रक्रियेत 4 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली तर 16 उमेदवारांची 21 नामनिर्देशनपत्रे वैध ठरली.
कर्जत-जामखेडमध्ये एकूण 27 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. छाननीनंतर त्यातील 4 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली. आता 16 उमेदवारांची 23 नामनिर्देशनपत्रे उरली आहेत. अर्ज माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल.