कोविडच्या 19 रुग्णांचा समावेश; 1803 पोलीस केसचाही समावेश
– प्रकाश गायकर
पिंपरी – महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी वर्दळ असते. करोनाकाळात मागील आठ महिन्यांत या रुग्णालयात तब्बल 1883 रुग्ण ब्रॉड डेथ (उपचारापूर्वीच मृत्यू) झाल्या आहेत. त्यामध्ये करोनाच्या 19 रुग्णांचाही समावेश आहे. तसेच अपघात, वृद्धापकाळ, आत्महत्या याचाही यामध्ये समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात उद्योगधंदे स्थिरावल्याने शहरातील लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणामध्येही वाढ झाली आहे. तसेच एखाद्या व्यक्तीच्या आजाराचे उशिरा निदान झाले तर त्यावर उपचार करणे अशक्य होते. तर काही जण वैयक्तिक कारणामुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अशा रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो.
‘वायसीएम’ रुग्णालयामध्ये मार्च महिन्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत तब्बल 1883 रुग्णांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 1803 रुग्णांच्या बाबतीत पोलीस यंत्रणेला कळविण्यात आले आहे. त्याची एमएलसी दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये अपघात, आत्महत्या, खून याचा समावेश असतो. तर काही रुग्णांना सर्पदंश, हृदयविकाराचा झटका आल्याने किंवा इतर आजार असल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू होतो. त्यांची नोंद नॉन एमएलसी म्हणून केली जाते. गेल्या आठ महिन्यांत अशा 61 रुग्णांची नोंद झाली आहे.
आठ महिन्यांमध्ये 19 करोनाबाधितांना रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यूने गाठले आहे. उशिरा आजाराचे निदान होणे, वेळेत उपचार न मिळणे यामुळे उपचारापूर्वीच त्यांचे निदान झाले असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जुलै महिन्यांपासून नागरिकांमधील करोनाची भीती काहीसी कमी झाल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जाऊ लागले. आजार गंभीर झाल्यानंतर रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने उपचारापूर्वीच मृत्यू होत आहे. जुलै महिन्यामध्ये 7, ऑगस्ट 3, सप्टेंबर 8 व ऑक्टोबर महिन्यामध्ये एका करोनाबाधितांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.
तीन महिन्यांत 1042 मृत्यू
प्राप्त माहितीनुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सर्वाधिक ब्रॉड डेथ झाल्या आहेत. एमएलसी व नॉन एमएलसी एकत्रित करून जुलैमध्ये 354, ऑगस्ट 360 व सप्टेंबर मध्ये 328 अशा 1 हजार 42 जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.
वायसीएम रुग्णालय शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असल्याने याठिकाणी अपघात, आत्महत्या, इतर दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना दाखल केले जाते. बऱ्याचदा अपघातांमध्ये काहीजण जागेवर दगावले जातात. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर तपासणी करून डॉक्टर मृत घोषित करतात. जुलै महिन्यापासून करोनाच्या रुग्णांचाही उपचारापूर्वीच मृत्यू होऊ लागला. त्याला हलगर्जीपणा हे प्रमुख कारण आहे. लक्षणे दिसल्यानंतरही लवकर चाचणी न केल्याने तसेच माहित असूनही उपचारास टाळाटाळ केल्याने जीवावर बेतले आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय