कोल्हापूर – जयसिंगपूर पोलीस ठाण्यातच चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी आज अटक केली. पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 185 मोबाईल चोरणारा रघुनाथ कदम आणि त्याचा सहकारी विकास उर्फ विलास पाटील या दोघांना आज जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस ठाण्यातच चोरी झाल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे या चोरट्यांना कोणत्याही परिस्थितीत शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात 185 मोबाइल चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत जयसिंगपूर इथं राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार रघुनाथ कदम आणि त्याचा साथीदार विकास उर्फ विलास पाटील यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती पोलिसांना समोर आली.
संशयित कदम याने जयसिंगपुर इथल्या श्री माता पतसंस्थेत चोरी केली होती. त्यावेळी पोलिसांनी कदमच्या प्रेयसीकडून मोबाईल हस्तगत केला होता. त्यानंतर कोर्ट ऑर्डर प्रमाणे तिचा एक मोबाइल परत देण्यात आला. मात्र दुसरा मोबाईल परत देण्यात आला नव्हता. त्यामुळे रघुनाथ कदम याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षात जाप्त केलेले 185 मोबाईल चोरून नेले होते. तर त्याचा साथीदार विकास पाटील यांनी अर्जुनवाड पुलावरून कृष्णा नदी पात्रात हे पोते फेकून दिले. आज जयसिंगपूर पोलिसांनी बोटीच्या मदतीने कृष्णा नदी पात्रात जाऊन मोबाईल असणारे पोते जप्त केले.
जयसिंगपूर पोलिसांना पोलीस ठाण्यात झालेल्या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक जयसिंगपूर पोलिसांचे पथक शिरोळ पोलिसांचे पथक काम करत होते.