चार महिला बेपत्ता तर 14 जणांना वाचवण्यात यश
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या संतकबीरनगरमधील घाघरा नदीच्या रामबाग घाटाजवळ डोंगीची बोट उलटल्याने चार महिलांसह 18 जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चार महिला बेपत्ता झाल्या, तर 14 जण पोहायला यशस्वी झाले असून त्यांचे प्राण वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे.
धानघाटा पोलीस स्टेशन परिसरातील बालमपूर आणि छपरा पुरवी गावातील 18 जण आज सकाळी घाघरा नदीच्या दोन भागांमध्ये असणाऱ्या वाळूमध्ये पेरलेल्या पिकाची कापणी करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, त्याचवेळी बोट पलटी झाली आणि यात बोटीतील सर्वजण नदीत बुडाले. बुडणाऱ्यांपैकी 14 जण बाहेर पडले असले तरी छपरा पूर्व आणि बलमपूर येथील प्रत्येकी दोन महिला बेपत्ता झाल्या आहेत. तहसीलदार वंदना पांडे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
स्थानिक लोक बेपत्ता महिलांचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच एसडीएम प्रमोद कुमार, सीओ ए.के.पांडे, एस.ओ.रणधीर मिश्रा यांच्यासह अन्य अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बुडलेल्या लोकांचा शोध सुरू केला.