मुंबई : राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत करोनाचे 3 हजार 032 हजार रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 139 जणांचा मृत्यू झाला आहे. पण सुदैवाने संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातून करोनाचा 100 वा रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी देशभरातील सर्वात जुन्या रुग्णालयांपैकी एक अशी कस्तुरबा रुग्णालयाची ओळख आहे.
याच रुग्णालयातून कोरोनाचा शंभरावा रुग्ण बरा झाला आहे. या रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकाने घरी परतण्यापूर्वी कस्तुरबा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत 100 रुग्ण पूर्णपणे घरी परतले आहेत. यात 24 ज्येष्ठ नागरिकांचा तर दहा वर्षाखालील 7 बालकांचाही समावेश आहे.
साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्या दिवसापासून हे रुग्णालया करोनाबाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी अक्षरशः दिवस-रात्र एक करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.
कस्तुरबा रुग्णालयातून आतापर्यंत 100 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात 60 पुरुष आणि 40 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षावरील वय असणाऱ्या 24 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर 10 वर्षाखालील 7 बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये समावेश आहे.
मुंबई उपनगरातील 75 रुग्ण बरे
तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांतून कोरोनाचे 75 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात सर्वाधिक 30 रुग्ण हे जोगेश्वरी परिसरातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत.् यापाठोपाठ कुर्ल्यातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून 22, तर घाटकोपरमधील राजावाडी परिसरातील वाडीलाल छत्रभुज गांधी आणि मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.