गरम पाण्याचे झऱ्यांची निर्मिती आणि उपयुक्तता
अनभिज्ञतेमुळे वारंवार दुर्लक्ष : कोकणात सर्वाधिक प्रमाण असल्याचा अभ्यासकांचा दावा
पुणे – राज्यातील रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये नवीन 17 गरम पाण्याचे झरे आढळले आहेत. आणखी काही ठिकाणीदेखील अशाप्रकारे गरम पाण्याचे झरे असण्याची शक्यता अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या आणि पर्यटनासाठी उपयुक्त असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांबाबत अनभिज्ञतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या योग्य संवर्धनाची गरज शास्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या वनस्पतींबाबत पुण्यातील भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या अभ्यासकांकडून संशोधन केले जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा अभ्यास सुरू असून या अभ्यासांतर्गत या गरम पाण्याच्या झऱ्यांचा शोध लागला आहे. प्रामुख्याने कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे झरे अस्तित्वात असल्याचे सांगितले जात आहे. विभागातर्फे सुकुमार भक्ता हे याबाबत अभ्यास करत आहेत.
भक्ता म्हणाले, पालघर येथील हलोली, चिपळूण येथील अरवल्ली, महाड येथील साव अशा विविध ठिकाणी हे गरम पाण्याचे झरे आढळले आहेत. मात्र या झऱ्यांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या अनभिज्ञतेमुळे या झऱ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी पुरातन मंदिराजवळ, डोगरांमध्ये हे झरे आहेत. मात्र याबाबत फारशी माहिती नसल्याने त्यांचे योग्य संवर्धन होत नाही. परिणामी औषधी गुणधर्म असलेल्या या झऱ्यांची दुरवस्था होत आहे. राज्यातील गरम पाण्याच्या झऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे.
भूगर्भातील खालच्या थरात असलेल्या लाव्हामधून बाहेर पडणारी उष्णता ज्यावेळी भूगर्भातील पाण्याला मिळते, त्यावेळी पाण्याचे तापमान वाढते. लाव्हामुळे मिळणाऱ्या उषणतेमुळे तापलेले हे पाण्याचे स्रोत म्हणजेच गरम पाण्याचा झरा (हॉट वॉटर स्प्रिंग)असतो. काही ठिकाणी या झऱ्याचे तापमान सामान्य असते. अशावेळी या झऱ्यामध्ये नागरिक अंघोळदेखील करू शकतात. मात्र, काही ठिकाणी हे तापमान अतिशय घातक असते. या पाण्यात असणाऱ्या विशिष्ट सूक्ष्मजीवांमुळे त्वचेचे रोग नष्ट होण्यास मदत होते.