जम्मू – जम्मू काश्मीरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 168 रोहिंग्यांची तेथील प्रशासनाने धरपकड करून त्यांना कारागृहात डांबले आहे. संशयास्पद नागरीकांचे बायोमॅक्ट्रिक्स घेऊन त्यांची कागदपत्रे तपासण्याचे काम सध्या, प्रशासनाने सुरू केले आहे. त्या मोहिमेत हे 168 बेकायदेशीर नागरीक सापडले असून त्यांना हिरानगर कारागृहात ठेवण्यात आले आहे.
हे रोहिंग्य मुस्लिम नागरीक म्यानमार मधून बांगलादेशात आणि तेथून बेकायदेशीरपणे भारतात येत आहेत. जम्मू काश्मीरात बांगलादेशी घुसखोरहीं मोठ्या प्रमाणात राहात असून त्यांना आणि रोहिंग्यांना त्वरीत बाहेर काढण्यात यावे अशी मागणी जम्मू काश्मीरातील विविध संघटनांकडून केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13 हजार 700 विदेशी घुसखोर या राज्यात स्थायिक झाले आहेत.