नवी दिल्ली – करोना प्रतिबंधक लसीकरणाला देशात शनिवारी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी एक लाख 65 हजार 714 जणांचे लसीकरण करण्यात आले. देशभरात या लसीकरणासाठी 16 हजार 755 लसीकरण कर्मचारी कार्यरत होते. लसीकरणानंतर दवाखान्यात दाखल करावे लागल्याची एकही घटना नोंदवली गेली नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी शनिवारी सकाळी दूरदृष्य प्रणालीदवारे जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन केले. या साथीविरोधातील लढ्यात आघाडीवर असणाऱ्या शास्त्रज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अभिवादन करताना पंतप्रधान काहीसे भावूक झाले होते.
या आणीबाणीच्या आणि नैराश्य पसरलेल्या काळात कोणी तरी आपले आयुष्य पणाला लावून आपल्याला वाचवले आहे, असे सांगून ते म्हणाले, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर यापुढेही सुरूच ठेवावा लागणार आहे.
या लसीकरणानंतर महराष्ट्रात 13 जणांना काहीसा त्रास झाला. मात्र त्यात एकही गंभीर स्वरूपाचा नव्हता. मात्र राज्य सरकार त्रास होण्याच्या नेमक्या कारणाचा अभ्यास करत आहेत.
देशात पहिल्या टप्प्यात तीन कोटी आघाडीच्या करोना योध्यांना लस देण्यात येणार आहे.
त्यासाठी तीन हजार सहा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर रोज 100 जणांना लस देण्यात येईल. त्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या दोन लसीपैकी एक लस देण्यात येईल. त्याच लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनी घ्यायचा आहे.