पिंपरी (प्रतिनिधी) – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 10) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 152 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि शहरांच्या देखील सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा सुरू आहेत. त्यांनादेखील प्रशासनाकडून विशेष परवानगी घेऊन प्रवास तसेच हालचाली कराव्या लागत आहेत. अनेक नागरिक शहरात जिथल्या तिथे अडकून पडले आहेत.
बहुतांश ठिकाणी पोलीस यंत्रणा लाठी तंत्राचा वापर करीत आहेत. संचारबंदी लागू असताना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घेण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, तसेच विनाकारण सार्वजनिक ठिकाणी घुटमळणे हा गुन्हा आहे. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 152 जणांवर कारवाई करण्यात आली.