मुंबई – राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज वाढत असणारा कोरोना रुग्णांचा आकडा आणि त्यात वाढणारे मृत्यूचे प्रमाण, नागरिकांसह प्रशासनाच्या मनात धडकी भरवत आहेत. कुणाला बेड नाही तर कुणाला ऑक्सिजन नाही. कोरोनाने गावची गाव पोखरली आहेत.
मात्र एकीकडे कोरोनाने सर्वांना हतबल केलं असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यात 151 गावच्या ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून, आपल्या गावात कोरोनाला येण्यापासून रोखलं आहे. या सर्वच गावात प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या नियमांचं पालन काटेकोर पणे करत असल्यानं, या गावातील ही वृद्ध मंडळी आपलं आयुष्य चांगल्या वातावरणात जगत आहेत.
या गावांची सरासरी लोकसंख्या जवळपास 2 हजार आहे. त्यात या वृद्ध मंडळींचा आकडा देखील मोठा आहे. एकीकडं राज्यात कोरोनाने थैमान घातलं असतांना, या गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. हे कसं करून दाखवलं? टिप्पटवाडीचे सरपंच विष्णू शेंडगे सांगतात, गावच्या प्रत्येक नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडली. ऊस तोडणीहून आलेल्या किंवा पर जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांना गावालगत 15 दिवस क्वारंटाईन केलं. त्यांची सर्व जबाबदारी इतर गावकऱ्यांनी घेतली. गावातील यात्रा उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. विवाह सोहळा मोजक्या लोकांमध्ये पार पाडले.
सामुदायिक ठिकाणी लोकांना जमू न देणं, सतत मास्कचा वापर करणं. या नियमांचं पालन केलं. ग्रामपंचायतीत दक्षता समिती नेमली होती. त्यानुसार कारखान्यातून येणाऱ्या लोकांना दिवस बाहेर ठेण्यात आलं. शासनाच्या प्रत्येक नियमांचं पालन केल्यानं, आज या गावात एकही कोरोना रुग्ण नसल्याचं सांगत गावकऱ्यांना याचा अभिमान देखील वाटत आहे.
ग्रामस्थ किशोर भगत सांगतात, बीड जिल्ह्यात 1031 गावं आहेत. त्यापैकी आजपर्यंत 880 गावात या महामारीनं आपले मुळं रोवली आहेत. मात्र, या टिप्पटवाडीसह 151 गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. शासनाने सांगितलेल्या नियमांचं पूर्णपणे पालन टिप्पटवाडी गावातील प्रत्येक नागरिकाने केलं आणि त्यामुळे गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळलेला नाही.
शासनाच्या नियमांना तडा न देता दिलेल्या नियमांचं पालन संबंध गाव करत. तसेच या निमित्ताने आम्ही इतर गावांना आवाहन करत आहोत “गावातील लोकांनी सोशल डिस्टर्नसिंगच पालन करावं तसंच काही आजार किंवा काही लक्षण असतील तर स्वतः quarantine राहावं. गावाबाहेर quarantine साठी जागा बनवावी. सामाजिक जागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करा आणि आपल्या प्रत्येक प्रिय व्यक्तीला कोरोनाच्या या भयानक आजारापासून वाचवा.
बीड तालुका (14 गावे) अंबाजोगाई (9), आष्टी (8), किल्ले धारूर (36), गेवराई (41), केज (4), माजलगाव (5), पाटोदा (15), परळी (31) आणि शिरूर कासार (2) अशा गावांनी करोनाला वेशीबाहेरच रोखलं आहे.
याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार सांगतात, आज जिल्ह्यातील गावच्या गाव कोरोनाच्या या विळख्यात अडकले आहेत. त्यात दररोज हजारी पार निघणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता चौदाशे पार झाला आहे. त्यामुळं गावातील कित्येक घर ओस पडली आहेत. तर कित्येक घरातील व्यक्ती गेल्यानं घरात स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळं आज जो तो आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी लढत आहेत. मात्र, बीडच्या 151 गावातील ग्रामस्थांनी शासनाच्या सूचनांचे योग्य पालन केलं. गावात स्वतंत्र क्वारंटाईन केंद्र सुरू केलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना आवर घातला. त्यामुळं हे या गावच्या ग्रामस्थांनी करून दाखवलं.कोव्हीड- प्रतिबंधात्मक दलांची गाव पातळीवर स्थापना केली आणि गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तरुण कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने उपाययोजना केल्यामुळे गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही.