कृषी विभाग : आठवड्यात पंचनामे करण्याच्या आमदार सुनील शेळके यांच्या सूचना
तळेगाव दाभाडे – आंदर मावळात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत माहिती मिळताच मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून मंगळवारी (दि. 29) आंदर मावळचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून एक आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश शेळके यांनी कृषी, महसूल विभागाला दिले आहेत. मावळात अतिवृष्टीमुळे 1500 हेक्टर भातपिकाला फटका बसला.
आंदर मावळात अतिवृष्टीमुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाले असून, अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
आमदार सुनील शेळके यांनी वडेश्वर, माऊ, लष्करवाडी, गभालेवाडी, दवणेवाडी या गावांत अतिवृष्टीमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरचिटणीस सुदाम कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, सरपंच गुलाब गभाले, कशाळ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सभापती अनिल जाधव, माजी सरपंच छगन लष्करी तसेच नारायण मालपोटे, सहादू शिंदे, संदीप लष्करी, मुकुंद खांडभोर आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटामुळे मावळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विनाविलंब नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मावळ तालुक्यात 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसाने सुमारे 920 हेक्टरवर भातशेतीचे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या पावसाने सुमारे 600-800 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले. या ठिकाणी भातशेतीचे पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी परगावी गेलेल्या कर्मचारी आल्यावर पंचनामे करण्यात येतील. पिकविमा कंपनीलाही यासंदर्भात पत्र पाठवून नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.
– देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी, मावळ.