नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टी सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल 150 कोटींचा खर्च आला असेल. हेच पैसे देशभरातील मजुरांना त्यांच्या गावी मोफत पोहोचवण्यासाठी वापरता आले नसते का, असा सवाल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
हेमंत सोरेन म्हणाले की, केंद्र सरकारकडून आमच्या अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे झारखंडला केंद्राकडून अजून एकही व्हेंटिलेटर मिळालेला नाही. आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीसह काम करत आहोत. मात्र, कोरोनाच्या संकटातही व्हर्च्युअल रॅलीजचे आयोजन करणारा भाजप आपल्याच धुंदीत वावरत आहे.