काम समाधानकारक नसल्याचे कारण देत मान्यता रद्द
पिंपरी – शासकीय व निमशासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकने शहरातील विविध भागात 28 नागरी सुविधा केंद्राना दुसऱ्या टप्प्यात मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी 15 सविधा केंद्रांचे काम समाधानकारक नसल्याचे कारण देत या केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सुरुवातीला महापालिकेने 69 नागरी सुविधा केंद्रांना मान्यता दिली होती. मात्र, काही दिवसांतच ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे व प्रत्येक महिन्यात नागरिकांचे किमान 20 अर्ज स्वीकारले नसल्यामुळे 19 केंद्र जुलै महिन्यात बंद करण्यात आली होती. त्यामुळे, शहरात काही दिवस 50 केंद्रच सुरु होती. मात्र, जुलै महिन्यात महापालिकेने पुन्हा 16 केंद्रांना परवानगी दिल्यामुळे 66 केंद्र शहरात सुरु होती. प्रत्येक प्रभागात किमान 3 नागरी सुविधा केंद्र सुरु करण्याचा नियम आहे. तसेच दोन केंद्रामध्ये किमान दोन किलोमीटरचे अंतर असावे, अशी अट आहे. अशा स्थितीतही काही सुविधा केंद्राचे काम समाधानकारक नसल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी होत्या.
महापालिकेने सुरवातीला 2016 साली 28 ठिकाणच्या नागरी सुविधा केंद्राना मंजुरी दिली होती. या केंद्राना 3 वर्षासाठी परवानगी देण्यात आली होती. ही मुदत 11 जून रोजी संपली होती. मुदतवाढीसाठी या केंद्रचालकांची अर्ज आल्यानंतर त्यातील 15 केंद्रचालक नियमानुसार कामकाज करीत नाहीत. तसेच अल्प प्रतिसाद आणि इतर कारणे दाखवित त्या केंद्रांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. तर उर्वरित 13 नागरी सुविधा केंद्राना पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान रद्द केलल्या केंद्राच्या ठिकाणी नव्याने अर्ज मागविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
185 प्रकाराच्या सुविधा…
नागरी सुविधा केंद्रामध्ये 185 प्रकारचे सुविधांचे अर्ज स्वीकारले जातात. तसेच महापालिकेचा मिळकतकर, पाणीपट्टीची बिलेही या केंद्रामधुनच जमा करता येतात. विविध प्रकारच्या अर्जासाठी केंद्रचालक 20 रुपये शुल्क नागरिकांकडून आकरतात. त्यातील 5 रुपये पालिकेलेला अदा केले जातात. त्यामुळे, या केंद्रातून नागरिकांच्या सुविधेबरोबरच महापालिकेच्या महसुलामध्येही काही प्रमाणात वाढ होते.
जाचक अटी शिथिल करण्याची मागणी
नागरी सुविधा केंद्राना परवानगी देण्यासाठी अनेक जाचक अटी असल्याने अनेक प्रभागात अद्यापही नागरी सुविधा केंद्र सुरु झालेले नाहीत. त्यामुळे, अनेक नागरिकांची अद्यापही गैरसोय होत आहे. केंद्रासंमधीच्या जाचक अटी शिथिल करुन सुविधा केंद्र नसलेल्या प्रभागात तातडीने नागरी सुविधा केंद्र सुरु करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.