भिवंडी- करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउननंतर अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या हेतूने राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले आहेत. एकीकडे राज्य सरकार “मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना भिवंडीत 15 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 18 जून ते 3 जुलैपर्यंत भिवंडी शहर पूर्णपणे बंद असणार आहे. करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.
भिवंडी शहरात सोशल डिस्टन्सिंग पाळण होत नसल्याने करोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला पाहिजे, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दर्शविला. त्यानंतर आयुक्तांनी त्याला परवानगी दिली.
दरम्यान, शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. या काळात फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकाने ठराविक वेळेसाठी सुरु राहतील. याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कळवण्यात आले असल्याचे प्रतिभा पाटील यांनी सांगितले आहे. भिवंडी शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत करोनाचे 650 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.