मुंबई : विधानसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत आयकर विभागाने विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
निवडणुकांमध्ये पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी धडक कृती दलाची क्षमता वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून आत्तापर्यंत प्राप्तीकर विभागाने मुंबईतून सुमारे 15.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
याशिवाय प्राप्तीकर विभाग 21 ऑक्टोबपर्यंत बेहिशेबी रोख रक्कम, मौल्यवान वस्तुंच्या व्यवहारांवर विशेष वॉच ठेवणार आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध जिल्हे/ मतदारसंघांमध्ये नियंत्रण कक्ष आणि जलद प्रतिसाद दल स्थापन करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर प्राप्तीकर विभागाने 1800221510 हा टोल फ्री क्रमांक सुरु केला असून, बेहिशेबी रोख रक्कमेसंबंधी माहितीसाठी (9372727823/9372727824) हे समर्पित व्हॉट्स अप क्रमांक सुरु केले आहेत. निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्राप्तीकर विभागाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांमधून व्यापक जनजागृती कार्यक्रम तसेच विमानतळ, एफएम वाहिन्या आणि समाज माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे.