नगर (प्रतिनिधी) – राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमघ्ये (टीईटी) अपात्र ठरलेल्या तब्बल सात हजार 880 परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
आता याबाबतची जिल्हानिहाय नावे पुढे आली आहेत. यात नगर जिल्ह्यात 149 बोगस शिक्षक आहे. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल सात हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र होते.
2019-20 च्या टीईटी परीक्षेतील पहिला पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 10 हजार 487 जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर दोनसाठी एक लाख 54 हजार 596 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सहा हजार 105 जणांना पात्र ठरविण्यात आले होते.
हा निकाल 19 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. या पडताळणीत सात हजार 800 विद्यार्थी अपात्र असताना त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले आहे. टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी सुकाराम सुपे सुखदेव ढेरेसह 15 जणांविरोधात 3,995 पानाचे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजूनही याप्रकरणी दहा ते बारा आरोपींचा शोध सुरू आहे.