शेवगाव (प्रतिनिधी) : शेवगाव व पार्थर्डी या दोन शहराच्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या जायकवाडी नळपाणी पुरवठा योजनेच्या स्वतंत्र कामाला मंत्री मंडळाने अखेर काल शनिवारी (दि १२ ) मंजुरी दिली . दोन्ही योजना मिळून सुमारे १४१ कोटी रुपयाच्या निविदा लवकरच निघणार आहेत.आमदार मोनिका राजळे यांच्या या ऐतिहासिक कामगिरी बद्दल दोन्ही तालुक्यातील राजळे समर्थकांनी त्याचे फटाके वाजवून स्वागत केले आहे.
नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागला आहे.दोन्ही शहराच्या पाण्याची गरज आगामी २५ वर्षांचा विचार करून आखण्यात येऊन माणशी ७० लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या बाबत आमदार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती दिली.यावेळी शिवसेनेचे पाथर्डी तालुका प्रमुख अंकुश चितळे उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या २१ ऑगस्ट २०१४ पासून राज्य शासनापुढे याबाबत कागदपत्रांची पूर्तता होऊन पालिका पदाधिकाऱ्यांसह वेळोवेळी पाठपुरावा केला.सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शासनाने निधी उपलब्ध करून दिला.शुक्रवारी दुपारी याबाबतचा शासन आदेश जारी होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशाची प्रत नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे व उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके यांच्याकडे सुपूर्त केली.
पाथर्डी शहर पाणीपुरवठा योजनेसाठी ७३ कोटी ४७ लाख तर शेवगाव शहराच्या योजनेसाठी ६७ कोटी २७ लाख रुपये मंजूर झाले.आहेत गेल्या २१ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने योजनेला तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र करोनामुळे सर्व योजनांच्या अंमलबजावणीस तात्पुरती स्थगिती दिली होती.
दरम्यानच्या काळात प्रकल्पाच्या किमतीत बददरम्यानच्या काळात प्रकल्पाच्या किमतीत बदल होऊन सर्व अंदाज पत्रके नव्याने तयार करण्यात आली.योजनेच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राम शिंदे,बबनराव लोणीकर,पंकजा मुंडे यांचे सहकार्य लाभले सरकार मध्ये बदल झाला तरी आघाडी सरकारकडे विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गेल्या सहा महिन्यापासून सतत पाठपुरावा केला. विकास कामात राजकीय विचार सरणी बाजूला ठेवत आघाडी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला.
टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यरंभा आदेश दिल्या नंतर दीड वर्षात योजनेचे काम पूर्ण होणार आहे. विज बिल थकल्यास योजना बंदपडू नये म्हणून सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत स्वतंत्रपणे प्रयत्न सुरू आहेत.
एकूण प्रकल्प किंमतीच्या दहा टक्के रक्कम पालिकेने उभारायची आहे. जुन्या योजनेतील तांत्रिक दोष व पाण्याची वाढती मागणी यामुळे वारंवार पाणीपुरवठा खंडित होई. त्यावर सुद्धा विरोधकांकडून टीका होऊन शेवगाव व पाथर्डीला आमदारांकडून वेगळा न्याय दिला जातो.पाणीप्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही असा मुद्दा चर्चीला जायचा .
कुठल्याही टिकेला उत्तर देण्यापेक्षा पाण्याची मूलभूत गरज ओळखून राजकारण बाजूला ठेवत फारशी चर्चा न करता पाठपुरावा सुरू ठेवल्याने सकारात्मक निर्णय घेता आला.योजना कुणी आणली यावर शक्ती खर्च करण्यापेक्षा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाला यश येऊन लोकांना दररोज पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. याबद्दल समाधान मानायला हवे.
जायकवाडी धरणाच्या भिंतीकडील बाजूलाच जॅकवेल घेतली जाणार पाण्याचा तुटवडा कधीच भासणार नाही. पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार असल्यानेदोन्ही शहराचा विकास झपाट्याने होऊन एकूणच आर्थिक उलाढाल वाढणार आहे. निवडणुकीच्या वेळी राजकारण करू,पण विकास कामांमध्ये श्रेयवादाचा मुद्दा पुढे करून विरोधकांनी अडथळा आणू नये. असे अवाहन त्यांनी शेवटी केले .