सात हजार क्षेत्रांचे पंचनामे : शेती भुईसपाट
निमसाखर- इंदापूर तालुक्याला गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळ आणि सुकाळाने चांगलेच पिळून काढले आहे. यात शेतकऱ्यांचे सुकलेले आणि रापलेले चेहरे सुन्न करणारे आहेत. राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव, निसर्गाचा लहरीपणा आदी कारणांमुळे शेतकऱ्यांवर दरवर्षी आसूड ओढण्याचे काम होत आहे. गेल्या महिन्यापासून इंदापूर तालुक्यात परतीचा आणि वादळी पावसाच्या तडाख्यात शेती भुईसपाट झाली आहे. यात इंदापूर तालुक्यातील 141 गावांचा समावेश आहे. तसेच 14 हजार 33 शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच पेरणी केलेले क्षेत्र हे 10 हजार 597 एकर आहे. सुमारे 7 हजार 431 एकर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे 14 हजार शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे.
इंदापूर तालुका हा नीरा- भीमा नदीच्या पाण्यामुळे समृद्ध झाला आहे. यात उजनी पाणलोट क्षेत्रातील बॅकवॉटरमुळे इंदापूर तालुक्याच्या अर्थकारणाला गेल्या वीस वर्षांत दिशा मिळाली आहे. ऊस, केळी, डाळिंब, तरकारी पिकांमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक राहणीमानाचा दर्जा कमालीचा उंचावला आहे. दोन नद्यांच्या कुशीत वसलेल्या समृद्ध इंदापूर तालुक्याला अवर्षणग्रस्ताचा मुकाबला करावा लागत आहे. इंदापूर तालुक्यातील 22 गावे पाण्यासाठी व्याकूळ आहेत. त्यात गेल्या दोन ते तीन पिढ्या शेतीच्या पाण्यासाठी खपल्या आहेत. तरीही या 22 गावांसाठी शेतीला पाणी दिवास्वप्ने ठरली आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. यंदा जानेवारी महिन्यापासून दुष्काळ पाचवीला पुजलेला असल्याप्रमाणे ठाण मांडून बसला आहे. त्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून जुजबी कार्यवाही करून पाणीटंचाई निवारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. यात चाराटंचाईसाठी प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. किचकट नियमावलीत पशूधन मालक भरडले गेले होते.
- डाळिंबाला जबर तडाखा
इंदापूर तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. यातून अर्थकारणाला गती मिळाली आहे. मात्र, डाळिंबावरील तेल्या रोगांमुळे शेतकरी पुरता घायाळ असताना यावर्षी परतीच्या आणि वादळी पावसाने कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांनी कुटुंबाच्या उर्जितावस्थेसाठी डाळींबाचे नगदी पिक नकोसे करून टाकले आहे. - 14 हजार बाधितांची आकडेवारी
इंदापूर तालुक्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात 14 हजार शेतकरी बाधित झाले आहेत. एका कुटुंबात चार सदस्यसंख्या गृहीत धरली तर 56 हजार लोकांना याचा प्रत्यक्ष फटका बसला आहे. त्यात या 14 हजार शेतकऱ्यांवर निसर्गाच्या लहरीपणाची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या राहणीमानावर दूरगामी परिणाम होणार आहेत. यावर्षी या शेतकऱ्यांचा हक्काचा घास शेतकऱ्यांनी हिरावून नेला आहे. त्यामुळे आता वर्षभर पुढील पिकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुलांचे शिक्षण, अन्य खर्च, शेतीमधील गुंतवणूक आदी खर्च कसा भागवायचा, या चिंतेने शेतकरी नैराश्येत गेला आहे. - शेतीपूरक घटकांवर दूरगामी परिणाम
ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या शेतीवर निसर्गाने संक्रांत आणली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील 14 हजार शेतकरी यावेळी बाधित झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर शेतीपूरक व्यवसायांना प्रचंड झळ सोसावी लागणार आहे. यात कृषी सेवा केंद्र, सहकारी सोसायट्या, किराणा दुकान, अन्य व्यवसायांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गचक्राच्या गर्तेत सापडला असताना आता त्यांच्याशी निगडीत असलेला घटकही घायाळ झाला आहे.