अत्यावश्यक सेवाही केवळ सकाळी 8 ते 11 या वेळेत
नगर (प्रतिनिधी) – करोना विषाणूची साखळी दिवसेंदिवस आणखीच घट्ट होताना दिसत आहे. त्यातही ‘ब्रेक दी चेन’च्या अनुषंगाने घोषित केेलेल्या निर्बंधांचे योग्य रितीने पालन होताना दिसतच नाही. त्यामुळे आता पुढील चौदा दिवस, म्हणजे येत्या 30 एप्रिलपर्यंत नगर जिल्ह्यात जनता कर्फ्यु असेल, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांत पाहणी दौरा केला. त्यानंतर त्यांनी नियोजन भवनात पदाधिकारी व अधिकार्यांच्या उपस्थितीत करोनास्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद केला. करोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युशिवाय पर्याय नसल्याची भूमिका पालकमंत्री मुश्रीफ यांनी मांडली.
आढावा बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, ‘‘करोना संपुष्टात आल्याच्या भ्रमात सर्वच जण राहिल्याने आता दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भाजी, बेकरी, मिठाई आणि जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरीक योग्य काळजी घेत नाहीत. त्यातून करोनाचा आणखी प्रसार होत आहे. परिणामी त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत.’’
करोनाची बाधा झाल्यास रुग्णांमध्ये दिसणारी लक्षणे आता बदलली आहेत. ताप किंवा घसा खवखवण्यासोबत किंवा त्याऐवजी आता जुलाब, मळमळ सुद्धा होत आहे. त्यामुळे तातडीने तपासण्या करुन घेण्याची गरज आहे. त्यातही रुग्णांचे करोना तपासणीचे अहवाल अत्यंत तातडीने कसे देता येतील, त्यासाठी जिल्हा प्रशासानला सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.
करोनाबाधितांचे ‘होम आयसोलेशन’ बंद
तीव्र लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांना यापूर्वी घरातच विलगीकरण कक्षात राहण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामुळे आता संपूर्ण परिवार बाधित होत असल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे आता यापुढे करोनाबाधित रुग्णांना घरातच विलगीकरणात राहता येणार नाही. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, त्यांनी तातडीने इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होणे सक्तीचे करण्यात आल्याची घोषणाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केली.
हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याचा प्रोजेक्ट करणार..!
पुढील तीन ते चार दिवसांत रेमडेसिविर मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. …हिंगणे यांनी दिलेली आहे. ऑक्सिजनबाबत मात्र प्रशासन साशंक आहे. त्यासाठी आणखी किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, आता हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी नवीन यंत्रणा सापडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे 100 बेडच्या हॉस्पीटलमध्ये प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. त्याची माहिती घेऊन नगरमध्ये तसे प्रोजेक्ट राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातून काही प्रमाणात रिलिफ मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.