नवी दिल्ली – देशातील प्रत्येक नागरीकाला आरोग्य ओळखपत्र देण्याची सरकारची योजना असून आत्तापर्यंत देशात अशी 14 कोटी ओळखपत्रे तयार झाली आहेत अशी माहिती सरकारच्यावतीने आज संसदेत देण्यात आली.
आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले की, ही ओळख पत्रे नागरीकांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आली आहेत. तथापि या ओळखपत्रांचा अधिकाधिक नागरीकांनी वापर करावा अशी सरकारची अपेक्षा असून त्यासाठी एनएचएच्यावतीने व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील 10 कोटी 74 लाख गरजु कुटुंबांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे औषधोपचार मोफत दिले जात आहेत असेही त्यांनी सांगितले, याचा लाभ किमान 50 कोटी लोकांना होईल अशी अपेक्षा आहे.
राज्यांनीही त्यात भर घातल्याने लाभार्थींची संख्या 65 कोटी पर्यंत जाईल असे त्या म्हणाल्या. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशा वगळता देशातील सर्व राज्यांनी ही योजना संमत केली आहे.