वडगाव मावळ, दि. 15 (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यात लम्पीचा प्रादूर्भाव ओसरला असला, तरी एकूण 224 जनावरांना त्याची बाधा झाली होती. त्यापैकी 134 जनावरे बरी झाली असून, लम्पीमुळे तालुक्यातील एकूण 22 जनावरे (गोवंश) दगावली आहेत. तर उर्वरित लम्पीग्रस्त जनावरांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात पशुधनातील लम्पी चर्मरोगाची प्रकरणे आढळून येताच तातडीने 8 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लंपी संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित व निगराणी क्षेत्र घोषित केले. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर केले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची खरेदी विक्रीसाठी बाजार, प्राण्यांचे प्रदर्शन, जत्रा, प्राण्यांच्या शर्यती यावर निर्बंध आणले गेले. तात्काळ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. लंपीबाबत उपाययोजनांसाठी तज्ज्ञांचे 5 चमू बनवून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरण हाती घेतले.
मावळ तालुक्यात एकूण 28,815 जनावरे (गोवंश) आहेत. लम्पीची बाधा झाल्यानंतर त्यापैकी 28,717 जनावरांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. पशुधनातील लंपी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलत गतीने 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात हा आजार नियंत्रणात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्यामुळे लंपी बाधित जनावरांची संख्या कमी झाली आहे.
जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 163 गावातील जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. त्यामध्ये 4 हजार 223 जनावरांना हा आजार झाला होता. तातडीने लसीकरण हाती घेत 8 लाख 28 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. बाधित जनावरांपैकी 3 हजार 145 जनावरे बरी झाली असून 184 दगावली आहेत. सक्रीय (क्टीव्ह) जनावरांपैकी त्यापैकी 64 गंभीर आजारी आहेत. लम्पीमुळे मृत्यू झालेल्या 128 जनावरांच्या मालकांना 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे यांनी दिली.
खेड, इंदापूर होते हॉटस्पॉट
इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर, निमगाव, बारामती तालुक्यातील खांडज, लोणीभापकर व वडगाव निंबाळकर तसेच खेड तालुक्यातील किवळे गावे लम्पी प्रादुर्भावाची हॉटस्पॉट ठरली होती. इंदापूर तालुक्यात सर्वाधिक 1 हजार 172 जनावरे बाधित झाली होती. त्याखालोखाल बारामती 683, खेड 674, जुन्नर 363, दौंड 324, हवेली 278, शिरूर 271, मावळ 224, पुरंदर 122, आंबेगाव 101, मुळशी 61, भोर 14 तर वेल्ह्यामध्ये एक जनावर लम्पीने बाधित झाले होत.