महापौर वाकळे यांची प्रभात कार्यालयास सदिच्छा भेट
दीड वर्षात बदलणार नगरचा चेहरामोहरा : सोलर दिव्यांच्या माध्यमातून अडीच कोटींची बचत
नगर – यापूर्वी कोणी काय केले, त्यांनी काय करायला हवे होते. या खोला न जात महापौर झाल्यानंतर नगरकरांना मूलभूत सुविधा देवून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार केला. विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध केला. मुंबई, दिल्ली वाऱ्या करून विकासासाठी आतापर्यंत 133 कोटी 50 लाख रुपये निधी मिळविला असून या निधीतून लवकरच विकास कामांना सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात ही विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
वाकळे यांनी गुरुवारी सकाळी दैनिक प्रभातच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी वाकळे यांनी प्रभातच्या टिमबरोबर संवाद साधला. ते म्हणाले. विकास कामांसाठी निधी आवश्यक आहे. भाजपचे सरकार राज्यात आल्याने त्यांनी निवडणुकीत नगरकरांना दिलेले आश्वासन पाळला. पहिल्या टप्प्यात शंभर कोटींचा निधी उपलब्ध करू दिली. त्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, माजी खासदार दिलीप गांधी यांच्या सहकार्याने हा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला. आज हा निधी महापालिकेला उपलब्ध झाला असून त्यातून करण्यात येणाऱ्या विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे.
त्याबरोबर विशेष निधी म्हणून 10 कोटी, दलितवस्ती योजनेतून 10 कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून साडेपाच कोटी असा निधी उपलब्ध केला. तसेच महापालिकेच्या गुंतवणुकीतून व्याजापोटी आठ ते नऊ कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. असा 133 कोटी 50 लाख निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे. त्यातून शहरात विकास कामे केली जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात असून प्रत्येक प्रभागात विकास कामे दिसणार असून रस्ते, पाणी, वीज यासह कचरामुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रस्ते करताना कायमस्वरूपी होतील. ते रस्ते कधीही खोदावे लागणार नाही. अशा पद्धतीने करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून गटारी, नळकनेक्शन आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. फेज 2 या शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम आता 15 टक्के काम बाकी आहे. ते देखील कामे येत्या महिन्याभरात संपणार आहे.
त्यामुळे नगरकरांना मुबकल पाणीपुरवठा सुरू होईल. फेज 2 च्या कामाला दिरंगाई झाली. परंतु मी महापौर झाल्यानंतर सातत्याने बैठका घेवून काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्याला यश आले असून लवकरच ही योजना पूर्ण होवून नगरकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. नगर शहर कचरामुक्त करण्यासाठी शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून नव्याने कचरा संकलनासाठी वाहने घेण्यात येणार आहे. तब्बल 71 घंटागाड्या घेण्यात येणार आहे. तसेच शहरातील चारही झोनसाठी स्वतंत्र कचरा डेपा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक खर्चात मोटी बचत होईल. या जागा महापालिकेला उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. नाही मिळाल्यानंतर कचरा डेपोसाठी जागा खरेदी करण्याची तयारी ठेवली आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन करून या डेपो मध्ये टाकण्यात येईल. तेथेच त्यावर प्रक्रिया देखील करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
आज शहरातील पथदिव्यांचे विजबिल अडीच कोटींच्या घरात जात आहे. दरमहा पैसा महापालिकेला देतांना नाकेनऊ होत आहे. त्यावर पर्याय म्हणून सोलर यंत्रणा बसविण्याचा विचार आहे. त्यामुळे महापालिकेचे अडीच कोटी रुपये वाचणार असून तो पैसा शहरातील विकास कामांसाठी वापरता येणार आहे. नगरकरांना मुलभूत सुविधा उपलब्ध करू देण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या बैठकीला ठेकेदारांना कामे दर्जेदार करण्याचे आदेश दिले आहे. तसेच अधिकाऱ्यांना देखील नियमानुसार करण्याचे सांगितले आहे. मी चुकलो तरी गय करू नका असा सुचना दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली
महापालिकेत आजही अधिकारी एका दबावाखाली काम करताना दिसतात. तसेच नगरपालिका असल्यासारखेच कामे करीत आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला. वारंवार बैठका घेवून त्यांना काम करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. त्यानंतर पुन्हा बैठका घेवून कामांची विचारणा केली जात आहे. महापालिकेचा पगार घेतात. मग त्यानुसार काम करण्याची व आपले कर्तव्य बजावण्याची मानसिकता तयार केली आहे. आज महापालिकेला 34 अभियंत्यांची आवश्यकता आहे. परंतु दोन अभियंत्यांवर काम करताना कसरत होते. पण अभियंत्यांची मानसिकता बदलल्याने ते जोमाने काम करू लागले आहेत.