पुणे – यंदा गळीत हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील 36 पैकी केवळ 22 कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. उर्वरित 13 कारखान्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, ऊस टंचाईमुळे नगर जिल्ह्यातील 3 सहकारी आणि 4 खासगी अशा 7 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव पाठविले नाहीत. त्यामुळे हे कारखाने बंदच राहणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याला सलग दोन वर्षे दुष्काळाचा फटका बसल्याने ऊस क्षेत्रात घट झाली आहे. पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध होणार नसल्याने कारखाना सुरू केला तरीदेखील पूर्ण क्षमतेने बॉयलर सुरू राहणार नसल्याची परिस्थिती असल्याने अनेक कारखान्यांनी गाळपाचे परवाने मागितले नाहीत. तर दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात 400 चारा छावण्यांमध्ये 2 लाख जनावरांचा समावेश होतो. या छावण्यांमध्ये चारा म्हणून उसाचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे उत्पादन घटले आहे.
नगर जिल्ह्यातील परिस्थितीदेखील काहीशी अशीच आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यात मूबलक ऊस असल्याने साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले होते. त्यातील लाखो क्विंटल साखर अजूनही कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून आहे. दुष्काळात पाण्याअभावी शेतातील ऊस जळून गेला आहे. उपलब्ध ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कमी ऊस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारखान्यांचे गाळपही कमी दिवसाचे असणार आहे.
यंदा केवळ 70 हजार हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या गाळप हंगामात 30 सप्टेंबरपर्यंत गाळप परवान्यासाठी अर्ज करण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. या कारखान्यांनी मागील एफआरपीची थकबाकी दिली आहे. त्यामुळे या कारखान्यांना गाळप परवाने मिळण्यात अडचणी नाहीत.