Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यात सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या टेम्पोतील १३ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले. डहाणू तालुक्यातील धानिवरी गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव कंटेनर ट्रेलरचा ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश असून, या दुर्घटनेमुळे साखरपुड्याच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. टेम्पो चुकीच्या मार्गाने – प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमएच ४८ डीसी ७४७४) मध्ये ३० ते ४० प्रवासी होते. हा टेम्पो बापुगाव खडकीपाडा येथील बलराम जयराम दांडेकर यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाला होता. टेम्पो चुकीच्या मार्गाने मुंबई-गुजरात लेनवरून जात असताना धानिवरी गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रेलरचा (एनएल ०१ एसी ९११८) ताबा सुटला आणि कंटेनरचा भाग टेम्पोच्या डाव्या बाजूवर जोरात आदळला. या धडकेत एक दुचाकीही सापडली. हेही वाचा – ‘या’ तारखेपासून उष्णता कमी होणार; भारतीय हवामान विभागाची महत्वाची माहिती अपघात इतका भीषण होता की टेम्पो आणि कंटेनर दोन्ही रस्त्यावर उलटले. अनेक प्रवासी वाहनाखाली अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताची प्राथमिक कारणे – टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, कंटेनरचा वेग जास्त असल्याची शक्यता, रस्त्याचा अरुंद भाग, ट्रेलर चालकाचा वाहनावरील ताबा सुटणे, चुकिचा मार्ग अशी कारणे सांगितली जात आहेत. जखमींपैकी १४ जणांना डहाणू येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची नावे – या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सुरेश रत्न लाखट, पांडू गणपत लाखट, काळू गोविंद लाखट, सुनील अर्जुन दांडेकर, चिमा गोविंद कुऱ्हाडा, नमिता विठ्ठल दांडेकर, सारिका संतोष लाखट, आयुष सीताराम लाखट, सागर नामदेव शेंडे, वंदना शिवराम वळवी, सलोनी शिवराम वळवी, अजय अहाडी, रियांशी संतोष लाखट यांचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे.