नवी दिल्ली – सीमेवरील तणाव दूर करण्याच्या उद्देशातून भारत आणि चीनमध्ये उद्या (शनिवार) लष्करी पातळीवरील चर्चेची 12 वी फेरी होणार आहे. त्या बैठकीमुळे पूर्ण सैन्यमाघारीविषयी आणखी प्रगती होणार का याबाबत उत्सुकता असेल.
चीनी कुरापतींमुळे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) म्हणजेच सीमेलगत मागील वर्षीच्या मेपासून तणावाची स्थिती आहे. तो तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये राजनैतिक तसेच लष्करी स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत.
दोन्ही बाजूंमध्ये आतापर्यंत लष्करी पातळीवर चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. त्यानंतर तब्बल साडेतीन महिन्यांनी चर्चेची पुढील फेरी होत आहे. तणाव संपवण्यासाठी पूर्ण सैन्यमाघाराबीबत दोन्ही देशांमध्ये याआधीच सहमती झाली. मात्र, चर्चेवेळी दिलेला शब्द चीन प्रत्यक्षात पाळत नसल्याचे चित्र आहे.
वादाचा विषय ठरलेल्या काही भागांतून चीनने सैन्य आणि लष्करी सामग्री हटवली. मात्र, इतर काही भागांत तसे घडलेले नाही. त्यामुळे सीमेवरील तणाव पूर्ण निवळलेला नाही.