लखनौ – उत्तरप्रदेशात प्रियांका गांधी सक्रिय झाल्यापासून बहुजन समाज पक्षाने कॉंग्रेसवरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसवर पुन्हा टीका करताना म्हटले आहे की, कॉंग्रेसने आजवर नेहमीच लोकांना भुलवणाऱ्या घोषणा केल्या परंतु त्या घोषणा किंवा आश्वासने त्यांनी कधीच पाळली नाहीत म्हणून या पक्षावर आज वाईट दिवस आले आहेत.
आज कॉंग्रेसची जशी अवस्था झाली आहे तशीच गत भाजपचीही होणार आहे कारण त्यांनीही कधी आश्वासने पाळली नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आली तर महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांनी मोबाईल फोन आणि इलेक्ट्रीक स्कुटी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या घोषणेवर प्रतिक्रीया देताना मायावती यांनी म्हटले आहे की त्यांच्या या आश्वासनावरही कोणाचा विश्वास बसणार नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने जशी आकर्षक घोषणा आणि आश्वासने देऊन लोकांची फसवणूक केली तसाच प्रकार सध्या कॉंग्रेस कडून सुरू आहे.
देशाच्या अन्य राज्यांत कॉंग्रेसची सरकारे आहेत तेथे कॉंग्रेसच्या लोकांनी मुलींना या सुविधा दिल्या आहेत काय असा सवालही मायावतींनी केला आहे. मग उत्तरप्रदेशातील लोक त्यांच्या आश्वासनावर विश्वास का ठेवतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपने लोकांना महागाई, दारिद्य्र, आणि बेरोजगारी दिली त्यामुळे भाजपलाही याची फळे भोगावी लागणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.