पुणे, दि.16 – सराईताच्या गुन्हेगाराच्या अंत्यविधीला तब्बल 100 ते 125 दुचाकींची रॅली काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार धनकवडी ते कात्रज स्मशानभुमी परिसरात घडला आहे. याप्रकरणी 150 ते 200 जणांविरूद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धार्थ पलंगे, कुणाल चव्हाण, सुनील खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषीकेश भगत, गणेश फाळके याच्यासह साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र वेैंजळे यांनी फिर्याद दिली आहे. माधव हनुमंत वाघाटे या सराईताच्या अंत्यविधीला दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोळक्याने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास सराईत माधव वाघाटे याचा खून केला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याच्या अंत्यविधीसाठी 150 ते 200 जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. टोळक्याने बालाजीनगर ते धनकवडी आणि कात्रज स्मशानभूमीपर्यंत विना परवानगी रॅली काढून शांततेचा भंग केला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर मिरवणूक आणि रॅली काढण्यास बंदी असतानाही, टोळक्याने रॅली काढल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
” कोरोना नियमावलीचे आदेश झुगारून अंत्यविधीला 100 ते 125 जणांनी दुचाकी रॅली काढल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्ही पुैटेजमधील दुचाकींचे क्रमांक शोधून आरोपींचा शोध घेतला जात आहे.”
– बी. एस. खेंगरे, (पोलीस उपनिरीक्षक, सहकानगर पोलीस ठाणे)