२०२१ या वर्षात प्रवासासाठी अनेक निर्बंध असताना, आरोग्य तपासणीची सक्ती तसेच वेगवेगळ्या परवानग्या अश्या अनेक अडचणीतुन मार्ग काढत मरीन कमांडो (रिटायर्ड) रवी कुलकर्णी यांनी २०२१ या वर्षात भारतातील वेगवेगळ्या पर्वतरांगामध्ये सव्वाशेहून (१२५) अधिक ट्रेक्स करत अनोखा विक्रम केला आहे.
या ट्रेक्स मध्ये हिमालयातील केदारकंठ, तुंगनाथ, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, खीरगंगा यासारखे सुप्रसिद्ध ट्रेक्स, गोव्यातील दूधसागर वॉटर फॉल व इतर ट्रेक्स तसेच दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतरांगांमधील अनेक ट्रेक्सचा समावेश आहे.
रवी कुलकर्णी हे निवृत्त मरीन कमांडो असून त्यांनी जगातील पहिले पाण्याखालचे लग्न आयोजित करून २००३ साली विश्वविक्रम केला होता.
२०२१ या वर्षात प्रवासावर अनेक बंधने असताना सरासरी ३ दिवसातून १ असे १२५ पेक्षा जास्त ट्रेक्स रवी कुलकर्णी यांनी पूर्ण केले आहेत. सह्याद्रीतील अनेक ट्रॅक्स, कळसुबाई सारखे सर्वोच्च शिखर, गडकिल्ले यांचा अर्थातच या ट्रेक्समध्ये समावेश आहे.
या १२५ ट्रॅक्स पैकी ३० हून अधिक ट्रेक्स त्यांनी ‘सोलो’ म्हणजे एकट्याने केलेले आहेत, खीरगंगा हा हिमालयातील चार दिवसांचा पूर्ण ट्रेक ही त्यांनी एकट्यानेच केला. बरोबर कोणीही गाईड नसल्याने आणि मोबाईल नेटवर्क ही नसल्याने बऱ्याचदा मूळ ट्रॅक सोडून भरकटायला सुद्धा लागले पण तरीही हे ‘सोलो’ ट्रेक्स त्यांनी पूर्ण केले.
२०२२ या वर्षासाठीही रवी कुलकर्णी यांनी आपला ट्रेक्सचा प्लान तयार केला आहे त्यामध्ये लडाख मधील झंस्कार नदी वरील -30 ते -40 या तापमानामध्ये केला जाणारा चादर ट्रेक आहे तसेच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकही आहे.
रवी कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार ट्रेकिंगसाठी शारीरिक तंदुरुस्ती पेक्षा जास्त गरज इच्छाशक्ती, आवड यांची असते.ट्रेकिंग हा फक्त एक व्यायाम नसून निसर्गाशी एकरूप होण्याचा, गर्दी व धावपळीच्या आयुष्यातून शांतता मिळवण्याचा, गडकिल्ले, धबधबे, पक्षी, प्राणी आणि वनस्पतीं जवळून अभ्यासण्याचा तसेच स्थानिक लोक व त्यांची संस्कृति यांच्याशी जवळीक साधण्याचा सर्वात उत्तम व सोपा मार्ग आहे.