राजगुरूनगर : जगात “औद्योगिक हब” म्हणून प्रसिद्ध असलेल्या चाकण औद्योगिक (एमआयडीसी) क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमध्ये करोना घुसल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. एमआयडीसी मधील एका खाजगी कंपनीत काम करणारे 800 पैकी 120 कामगार पॉझिटिव्ह सापडल्याने मोठी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान ही परिस्थिती समोर येताच जिल्हा व तालुका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
एकीकडे तालुक्यातील चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपरिषदेत करोनाबाधित व्यक्तींची संख्या वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावे करोनाबाधित झाली आहेत. तालुक्यात १ हजार ३०० पेक्षा जास्त व्यक्ती करोनाबाधित झाल्या आहेत तर आतपर्यंत २५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. असे असताना आता चाकण एमआयडीसी मधल्या कंपनीत तब्ब्ल १२० कामगारांचा स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एमआयडीसीमध्ये हाहाकार उडाला आहे.
खेड तालुक्यात ग्रामीण भागात पुणे आणि मुंबई या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे करोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर तालुक्यातील 3 नगरपरिषदा, एमआयडीसीतील काही कंपन्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडले. बाधित व्यक्तींचा आलेख वाढू लागला. मागील काही दिवसांपासून तालुक्यात सरासरी ५० पेक्षा जास्त व्यक्ती करोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. प्रशासन काळजी घेत आहे . त्यासाठी काही नियम लागू केले मात्र कंपन्या आणि नागरिकांनी ते न पाळल्याने करोना संसर्ग तालुक्यात फ़ैलावला आहे. अलीकडे चाकण आणि त्या परिसरात बांधीत व्यक्तींची संख्या वाढत आहे, असे असताना आता एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
चाकण एमआयडीसीमध्ये तालुक्यात राहणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. याबरोबरच अनेक कामगार हे पिंपरी चिंचवड, भोसरी आणि पुणे या परिसरातून येत असल्याने करोना संक्रमण वाढत आहे. करोना संक्रमित भागात (कंटेनमेंट झोन) मध्ये राहणारे कामगार कंपन्यांमध्ये ये जा करीत असल्याने हा संसर्ग जोराने फ़ैलावला आहे. एमआयडीसीत कामगारांकडून त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. कंपन्यांमध्ये खेड तालुक्याच्या बाहेरचेही कामगार येत असून त्यांची गणना तालुक्यात होत नसल्याने या धोक्याची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र आता एकाच कंपनीत एकाच दिवशी 120जण बाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. यातील 60 ते 70 कामगार तालुक्यातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चाकण उद्योग नागरिक आता करोनाचे संकट घोंगावत असल्याने हे कारखाने चालू ठेवायचे कि बंद करायचे हे मोठे आव्हान कंपनी व्यवस्थापन आणि तालुका प्रशासनापुढे आहे.
तालुक्यात करोनाचे वाढते रुग्ण, उपचार घेताना दवाखान्यात उकळण्यात येणारे पैसे, करोनाचे संकट असताना सोशल डिस्टन्सचा अभाव आदी मुळे खेड तालुका जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. जेवढ्या तालुक्यात सेवा सुविधा उपलब्ध आहेत त्याही पेक्षा रुग्णाची संख्या वाढत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोशल डिस्टन्स आणि शासकीय नियम न पाळल्याने तालुका कारोना संकटाच्या खाईत लोटला आहे. अनेकदा लॉकडाऊन करूनही तालुक्यातील करोना संसर्ग कमी होत नाही उलट वाढत चालला आहे. प्रशासन आणि नागरिक घेत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
चाकण एमआयडीसी मधील “लियर” कंपनीत काम करणाऱ्या सुमारे 800 पैकी 120 कामगारांचा कारोना स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. तर प्रशासनाची झोप उडाली आहे. कामगार एवढ्या मोठ्या संख्येने करोना बाधित झाल्याची घटना देशात मोठी आहे.
आज चाकण येथील “लियर” कंपनीत खेड पस चे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी या कंपनीला भेट दिली, व्यवस्थापनाशी चर्चा केली. या कंपनीने नियमांचे पालन केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आले आहे. हि कंपनी तूर्तास बंद ठेवावी अशा सूचना सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिले असून चौकशी करून या कंपनीवर कारवाई केली जाईल, असे खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी सांगितले.