चेन्नई – तामिळनाडूतील विरूधनगर जिल्ह्यातील अचनकुलम गावात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 12 जण मरण पावले. तर अन्य 20 जण जखमी झाले. कारखान्यात अनेक जण अडकल्याची चर्चा स्थानिक नागरिकांत होती.
श्री मरय्यिमन पटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. या कारखान्याकडे पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेचे प्रमाणपत्र असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षात देशातील सर्वात मोठे फटाके उत्पादक असा त्यांचा नावलौकीक आहे. सहा खोल्यात साठवलेल्या फटाक्यांनी एका पाठोपाठ एक असा अचानक पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला, असे स्थानिकांनी सांगितले.
काही कामगार रसायन हाताळत असताना झालेल्या हलगर्जीपणामुळे आगीने पेट घेतला. ती जवळच काम सुरू असणाऱ्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर अनेक स्फोट सातत्याने होत होते. त्यामुळे घटनास्थळावर तातडीने मदत पोहोचवता आली नाही. सत्तूर, शिवकाशी, वेंबाकोट्टई येथून अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी आलेले आहेत. 10 शेडमध्ये येथे फटाके बनवण्याचे काम केले जात होते. हा कारखाना पूर्णपणे या स्फोटात उद्ध्वस्त झाला आहे. शेजारच्या अनेक शेडचे नुकसान झाले आहे.
सापडलेले मृतदेह पुर्णत: जळालेले असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचण येत आहे. जखमींपैकी काही जण 100 टक्के भाजलेले आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हा स्फोट दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाला. त्यात जखमी झालेल्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाचे कारण शोधत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्हाधिकारी आर. कन्नन आणि पोलिस अधिक्षक पेरूमल यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या कारखान्याचा परवाना निलंबित करणार असल्याची माहिती जिल्हा महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
तातडीने मदत पाठवा
या स्फोटात सापडलेल्या सर्व नागरिकांना राज्य सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी केली या स्फोटात मरण पावलेल्यांबाबत मी सहवेदना व्यक्त करतो असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधानांकडून मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवरे शोक व्यक्त करीत मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख तर जखमींना एक लाखाचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.