मंचर-लोंढेमळा येथील शेतकऱ्यांचे सहा लाखांचे नुकसान
मंचर- मंचर-लोंढेमळा (ता. आंबेगाव) येथे महावितरण कंपनीच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बारा एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. संबधित शेतकऱ्यांचे सहा लाख रुपयांहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऊस जळाल्याची घटना सोमवारी (दि. 24) दुपारी घडली. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने नेला जाईल, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
लोंढेमळा येथील शेतकरी किसन माशेरे 30 गुंठे, अरुण लोंढे एक एकर, विकास खानदेशे दीड एकर, जालिंदर लोंढे दीड एकर, कमलेश लोंढे 30 गुंठे, राधा माशेरे 10 गुंठे, मालुबाई लोंढे दीड एकर, लक्ष्मीबाई लोंढे अर्धा एकर,यमुनाबाई लोंढे 50 गुंठे, चंद्रकांत खानदेशे 30 गुंठे, निवृत्ती खानदेशे एक एकर, दत्तात्रय माशेरे एक एकर, अनिल लोंढे एक एकर असे एकुण 12 एकर 25 गुंठे क्षेत्रातील ऊस जळाला आहे.
घटनास्थळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब थोरात, सीताराम लोंढे, सामाजिक कार्यकर्ते जे. के. थोरात,विकास खानदेशे, रामराव खानदेशे, भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी जे. बी. भोर, व्ही. व्ही. पालेकर, एस. व्ही. गुंजाळ, एन. जी. वायाळ यांनी भेट देऊन पाहणी केली.