सातारा – सातारा लोकसभा निवडणुकीचे मतदान आज दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे, उल्लंघन केल्यास संबंधितावर आदर्श आचार संहितेचा भंग म्हणून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सातारा लोकसभेचे एकूण बुथ 2296 एवढे असून या मतदान केंद्रांवर 11 हजार 772 कर्मचारी प्रत्यक्ष काम करणार आहेत. तसेच 2 हजार 959 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारे 14 हजार 731 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विधानसभानिहाय नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना आज ईव्हीएम, व्हिव्हिपॅट यंत्रांचे तसेच मतदानाविषयी लागणाऱ्या साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. मतदान प्रकियेसाठी 1 हजार 103 वाहने अधिग्रहित करण्यात आले असून यामध्ये 5 लॉंचचाही समावेश आहे.
आज दुपारनंतर जावली खोऱ्यातील मतदान केंद्रांवर जाण्यासाठी मतदान केद्रांवर काम करणारे कर्मचाऱ्यांनी तापोळा येथून कोयना धरणाच्या पाण्यातून पलिकडे जाण्यासाठी तराफा आणि लॉंचचा वापर केला. मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदानाचा टक्का वाढावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.