कराड – कराड तालुक्याची करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्यातील एकूण 110 गावे करोनाबाधित आहेत. तर 26 गावे करोनामुक्त झाली आहेत, अशी माहिती कराड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली.
गत पाच महिन्यांपासून करोना महामारीमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. चार महिने सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे सर्वांचेच अर्थाजन ठप्प होते. सध्या बाजारपेठा सुरू आहेत. मात्र, करोनाबाधितांची वेग वाढत आहे.
बाजारपेठा सुरू आहेत. मात्र, करोनाची भिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या करोनाचा समूह संसर्ग स्थिती असल्याने कोणत्यावेळी तो आपल्या घरात येईल, याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. याला पर्याय म्हणजे स्वत:च स्वत:ची काळजी घेणे.
सध्या कराड तालुक्यातील 110 गावे करोनाबाधित आहेत. तर 26 गावे करोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये कराड शहर व मलकापूर ही गावे करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहेत. मलकापूर येथे 179 जण करोनाबाधित आहेत. तर कराड शहरातील बाधितांची 300 कडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शहरातील सुमारे 15 हजार 794 घरे ही कंटनेमेंट झोन मध्ये आहेत.
तर मलकापूरमधील 11 हजार 44 घरे कंटनेमेंट झोनमध्ये आहेत. गत दोन महिन्यांमध्ये करोनाचा हॉटस्पॉट ठरलेली वनवासमाची, तुळसण आदी गावी करोनामुक्त झाली आहेत. तेथील साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक नियम केले होते. तसेच नियम मलकापूर व कराड शहरात करणे गरजेचे आहे.
सध्यस्थितीत ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून बाधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, करोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस लॉकडाऊन गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. गेली चार महिने खूप मोठा फटका व्यवसायाला बसल्याने व्यापारी वर्गातून मात्र, त्याला विरोध होत आहे.
दरम्यान, उंब्रज व चोरे हेही करोनाचे हॉटस्पॉट ठरत तेथील बाधितांची संख्या 50 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उंब्रज विभागातही भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक गावे करोनापासून लांब होती. मात्र, त्याही गावांमध्ये करोनाची एन्ट्री झाल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रशासनाचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही मोठा ताण आला आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येत्या काही दिवसात करोनामुक्त गावांची संख्या नक्यीच वाढेल अशी अशा डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.