नवी दिल्ली – सौदी अरेबियात करोनामुळे 11 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती सौदीतील भारतीय दुतावासाने दिली. यातील मदिना येथे चार, मक्का येथे तीन, जेद्दाह येथे 2 आणि रियाध, दमाम येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पत्रक काढण्यात आलं असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
सौदीमध्ये असलेल्या भारतीयांनी काळजी करु नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवलात तर गोंधळाचं वातावरण उगाचच तयार होईल. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर अफवा पसरवण्यासाठी करु नका असेही आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न नको असेही सांगण्यात आले आहे.
करोनाची लागण ही कुठलाही धर्म, जात किंवा पंथ पाहून होत नाही. करोना विषाणूची लागण ही कुणालाही होऊ शकते. असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्याचंही उदाहरण देत कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. करोनामुळे जे रुग्ण सौदीत अडकले आहेत त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यात येते आहे. त्यांच्या जेवणाची आणि औषधोपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असेही सौदीतील भारतीय दुतावासाने स्पष्ट केले.