राजगुरूनगर – राजगुरुनगर येथील लोकअदालतमध्ये 164 खटले तडजोडीतून मिटवण्यात आले. यामध्ये तब्बल 11 कोटी 14 लाख रुपयांची वसुली झाली आहे. दाखलपूर्व 143 दावे निकाली काढण्यात आले यातून 28 लाख 61 रुपयांची रक्कम वसूल झाली.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 13) राष्ट्रीय लोकअदालतचे तालुका विधी सेवा समिती व खेड बार असोशिएशनच्या माध्यमातून न्यायालयाने आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एन. के. बह्मे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सह जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबळकर, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश आर. डी. पतंगे, एन. एस. कदम, पी. डी. देवरे, डी. बी. पतंगे, बार असोसिएशनचे ऍड. उपाध्यक्ष निलेश पवळे, सचिव ऍड. निलेश नाईकरे, ऍड. बी. एम. सांडभोर, ऍड. सुहास दौंडकर, ऍड. मालिनी शिंदे, ऍड. एच. एस. बगाटे, ऍड. विठ्ठल नाणेकर, ऍड. सुलभा कोटबागी, ऍड. संदीप रेटवडे, ऍड. विजय शिंदे, ऍड. मनीषा टाकळकर, अश्विनी मडके, ऍड. अतिक सय्यद, ऍड. प्रवीण बोंबले, ऍड. आदिनाथ कड, ऍड. गणेश गाडे, खेड पंचायत समितीचे रमेश इष्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षकार, विविध बॅंकांचे अधिकारी, खासगी फायनन्सचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व प्रकरणात बॅंक रिकव्हरी, वीज वितरण, पाणी पट्टी, घरपट्टी व इतर आदि प्रकरणे ठेवण्यात आली होती. तर न्यायालयातील प्रलंबित दाव्यांमध्ये तडजोडयोग्य फौजदारी खटले, धनादेश कलम 138, बॅंक रिकव्हरी खटले, मोटार अपघात, भू संपादन विषयक दावे, कौटुंबिक वाद, इतर दिवाणी खटले आदि स्वरुपाची प्रकरणे ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. निलेश पवळे यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. सागर मैड, तर ऍड. निलेश नाईकरे यांनी आभार मानले.
साधा संवाद, मिटवा वाद, असा संदेश देत लोक न्यायालयात पक्षकारांनी सलोख्याने व सामंजस्यातून प्रकरणे मिटवून वेळ आणि पैसे यांची बचत करावी. समोपचारणे मिटलेले वाद पुन्हा होत नसल्याने दोन्ही पक्षकारांना त्याचा फायदा मिळतो.
– एन. के. ब्रह्मे, न्यायाधीश, राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय