पुणे – इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेऊन ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अभ्यासक्रमातही 25 टक्के कपात केली आहे. दरम्यान, एप्रिल-मे मध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक व विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रकही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर झाले आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी सल्लागार समितीही नियुक्त केली आहे.
परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता यावा, स्वयंअध्ययनासाठी मदत व्हावी, परीक्षेला जाण्यापूर्वी आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषय तज्ज्ञ, विभागप्रमुख यांच्यामार्फत प्रश्नसंच तयार करण्याचे सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.
येत्या चार दिवसांत विद्यार्थ्यांना विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रश्नसंच उपलब्ध होणार आहे. नुकतीच मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत परीक्षांबाबत चर्चा झाली. करोनामुळे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रकानुसार घेणे शक्य न झाल्यास त्या लेखीपरीक्षेनंतर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येणार नाही.
पालकांना परीक्षेबाबतच्या सूचना राज्य मंडळाकडे पाठविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यातील योग्य सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येणार असून सूचनांचा एसओपी तयार करताना विचार करण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीतपणे व्हाव्यात यासाठी पालक संघटना व शिक्षकांनी शासनाबरोबर एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.