श्रीरामपुरात सर्वाधिक, पारनेर, पाथर्डी तालुक्यांत रुग्णांची नोंद नाही
नगर – शहरासह जिल्ह्यात साथीच्या आजारा बरोबर डेंग्यू सदृश आजाराचे थैमान सुरु असून जिल्हाभरात ऑक्टोबर अखेर डेंग्यूचे 108 रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी पासून आतापर्यंत 276 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे आकडेवारी मध्ये समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधीक 38 रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वाधिक कमी श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव तालुक्यात रुग्ण आढळले आहेत. तर पारनेर, पाथर्डी तालुक्यात रुग्णांची नोंद नसल्याचे आकडेवारी मध्ये समोर आले आहे. नगर शहरात 14 रुग्ण आढळून आले आहेत.
शहरात ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढीग, उघड्या गटारीमुळे दुर्गंधी परिसरात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झाल्याने साथीच्या आजारांनी नगरकर हैराण झाले आहेत. उपनगरातही डेंग्यूचा फैलाव झाला आहे. साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग प्रशासन कुचकामी ठरत आहे.
शहरातील कचरा संकलनाची नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.ठिक- ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सततच्या पावसामुळे कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. उघड्या गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने या मैलामिश्रित पाण्याने डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसापूर्वी सारसनगर येथील एक व महापालिका कंत्राटी कामगारांचा डेंगू आजाराने मृत्यू झाला. या घटनेनंतरही महानगरपालिका प्रशासनाने या आजाराबाबत उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच चांदणी चौका जवळील असलेल्या डिफेन्स कॉलनी मधील तिघांना डेंगू सदृश्य आजाराची लागण झाली आहे. या परिसरातील नाल्यांची साफसफाई न केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
डेंग्यू सदृश आजारामुळे शहरासह ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालय भरले आहेत. महापालिकेच्या दवाखान्यात सोयी-सुविधा नसल्याने, परिणामी गोरगरीब नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. डासांचे निर्मूलन करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध फवारणी होत नसल्याने नागरिकांमधून बोलले जात आहे. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती थांबून साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करणारा महापालिकेचा मलेरिया विभाग कोमात गेला आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभार उघड झाला असून, याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. साथीच्या आजारावर उपयोजनात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
तालुकानिहाय बाधित रुग्णांची आकडेवारी
श्रीरामपूर -38, कोपरगाव-4, नगर-6, राहाता-12, संगमनेर-10, राहुरी-10, श्रीगोंदा-1, कर्जत-3, नेवासा-3, अकोले-3, जामखेड-2 शेवगाव-2 असे 94 तर नगर शहरात- 14 असे एकूण 108 रुग्ण डेंग्यू सदृश आजाराने बाधित झाले आहेत. तर पारनेर, व पाथर्डी तालुक्यात रुग्णांची नोंद नाही.