सांगली – मिरज शहरामध्ये 2009 दरम्यान झालेल्या जातीय दंगली प्रकरणी 106 जणांची सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ही जातीय दंगल गणेश उत्सवादरम्यान घडली होती.
या दंगलीचे पडसाद त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत उमटले होते. सध्याच्या आघाडी सरकारकडून या दंगलीचे खटले बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आल्याने न्यायालयाने हा खटला निकाली काढत निर्दोष मुक्तता केली आहे.
मिरज शहरामध्ये 2009 साली गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेकडून अफजलखान वधाचा फलक उभारण्यात आला होता. त्यावर लिहिण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मिरजमध्ये जातीय दंगल भडकली होती. या दंगलीत मिरज शहर दहा ते पंधरा दिवस धगधगत होते. या दंगलीचे पडसाद सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले होते.
या दंगली प्रकरणी सांगली महापालिकेचे तत्कालीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापौर मैनुद्दीन बागवान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, मिरज शिवसेनेचे शहरप्रमुख विकास सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या 106 जणांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दंगलीचा खटला सांगली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होता.
महाविकास आघाडी सरकारकडून दोन महिन्यांपूर्वी हा खटला बरखास्त करण्याबाबत न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयाने खटला बरखास्त करून या दंगली प्रकरणी 106 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती बचाव पक्षाच्या वकील बिलकीस बुजरूक यांनी दिली.