कोपरगाव (शंकर दुपारगुडे / प्रतिनिधी) – कोपरगाव शहराला सध्या 6 दिवसांआड पाणीपुरवठा होतो. पालिकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 105 कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर कॉंक्रिटीकरण व एस. जी. विद्यालय परिसर प्रभाग क्रमांक 6 मधील रस्ता डांबरीकरण या विकासकामांचा प्रारंभ आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते वीरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमूद सय्यद, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा शिंगाडे, उद्योजक कैलास ठोळे, चंद्रकांत अजमेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल, भरत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार काळे म्हणाले, शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाल्याने आपल्या प्रयत्नातून पालिकेच्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. नवीन पाच नंबर तलावाचे 30 टक्के काम झाले आहे. उर्वरित 70 टक्के तलावाचे काम व शहरातील वाढीव पाइपलाइनच्या कामाकरीता 105 कोटी रुपये निधीची गरज आहे. तो निधी मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी, जीवन प्राधिकरण विभागाच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे निधी मंजूर होण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नवीन वर्षात 105 कोटीच्या निधीला अंतिम मंजुरी मिळणार असल्याचे सांगून शहरवासीयांना नव्या वर्षाच्या अनोख्या शुभेच्छा आमदार काळे यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले पालिकेच्या निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला, तरीही वहाडणे यांना शहर विकासकामांत सतत सहकार्य केले म्हणूनच विकासकामे गतिमान होत आहेत, असेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, काळे आमदार झाल्यापासून नव्हे, तर मी जसा नगराध्यक्ष झालो तेव्हापासून शहराच्या विकासकामांत पूर्ण सहकार्य करीत आहेत. म्हणूनच गेल्या 10 वर्षांत जितकी कामे झाले नसतील, त्यापेक्षा अधिक विकासकामे 4 वर्षांत झाली. उद्योजक कैलास ठोळे यांनी आमदार काळे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करून विकासकामांचा जो सपाटा सुरू आहे तो अविरत चालू ठेवावा, अशी आशा व्यक्त केली.
माजी नगरसेवक कृष्णा आढाव, संतोष चवंडके, मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड, संतोष गंगवाल, सुनील बोरा, प्रफुल शिंगाडे, रावसाहेब साठे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले.
निवडणुकीची उपस्थितांना झाली जाणिव
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी प्रभागात अनेक विकासकामे केली आहोत. तेव्हा जनतेने पुन्हा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अधिक मतानी निवडून द्यावे, अशी विनंती आमदार आशुतोष काळे यांनी मतदारांना यावेळी केल्याने पालिकेच्या निवडणुकीचा प्रारंभ झाल्याची जाणिव उपस्थितांना झाली.