पुणे/धनकवडी, दि. 23 – रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 104 टोल क्रमांक उपलब्ध आहे. मात्र ती मर्यादित असून, ही सुविधा व्यापक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्प्यात मुंबई शहरासाठी लवकरच ही सुविधा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर राज्यातील सर्व ग्रामीण भागात ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी आज केली.
भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय कम्युनिटी मेडिसिन विभाग व इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनतर्फे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनच्या 66 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन भारती विद्यापीठात करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रा. सावंत बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजीत कदम, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी, हेल्थ सर्व्हिसेसचे संचालक डॉ. नितीन आंबेकर, डॉ. जयश्री गोठणकर, डॉ. प्रकाश डोके, डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. प्रसाद पोरे उपस्थित होते. यावेळी चंदीगड येथील डॉ.आर.डी. बन्सल यांना एच.सी.तिवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. सावंत म्हणाले, आरोग्य विभागाकडून 104 क्रमांकावर रुग्णांना तातडीने उपचार मिळणार आहेत. त्याच्या जोडीला हेल्पलाइन आणि कॉल सेंटरही असणार आहे. मुंबईत या उपक्रमाचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर त्रुटी दूर केल्या जातील.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, “करोनामुळे आरोग्य व्यवस्थेसाठी गुंतवणूक करणे किती गरजेचे आहे हे कळाले. त्यावेळी सरकारने निर्णय घेऊन यासाठी मोठे काम केले. तंत्रज्ञान सतत बदलत आहे त्यामुळे या कॉन्फरन्ससाठी निवडलेला आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान हा विषय अतिशय समर्पक आणि गरजेचा आहे.’