जगातील सर्वांत मोठ्या शटडाऊन अभावी देशातील स्थिती असती आणखीच वाईट?
नवी दिल्ली : करोना फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा 21 दिवसांचा पहिला टप्पा मंगळवारी समाप्त झाला. त्या कालावधीत देशभरात 10 हजारहून अधिक करोनाबाधित आढळले. तर, करोनाचा संसर्ग झालेले 330 रूग्ण मृत्युमुखी पडले. अर्थात, जगातील सर्वांत मोठा शटडाऊन ठरलेले लॉकडाऊनचे पाऊल उचलले नसते; तर भारतातील स्थिती आणखी वाईट झाली असती, असे अनेक वैद्यकीय तज्ञांना वाटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला 3 आठवड्यांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्या लॉकडाऊनची अंमलबजावणी 25 मार्चपासून सुरू झाली. लॉकडाऊन सुरू होण्याआधी देशात 520 करोनाबाधित होते. त्यावेळी करोनाने 11 रूग्णांचा बळी घेतला होता. लॉकडाऊनचा पहिला आठवडा 31 मार्च या दिवशी पूर्ण झाला. त्या दिवशी देशातील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 397 आणि बळींची संख्या 35 इतकी होती. म्हणजे, लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात त्या संख्येत अनुक्रमे 878 आणि 24 ची भर पडली.
लॉकडाऊनचा दुसरा आठवडा 7 एप्रिलला संपला. त्यादिवशी बाधितांची संख्या 4 हजार 789 आणि बळींची संख्या 124 इतकी नोंदली गेली. त्या आठवड्यात बाधित आणि मृतांची संख्या अनुक्रमे 3 हजार 392 आणि 89 ने वाढली. आता पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनचा तिसरा आठवडा संपल्यानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 10 हजारांचा पल्ला पार केला आहे. तर मृतांची संख्या 350 वर गेली आहे. म्हणजेच, तिसऱ्या आठवड्यात त्या संख्येत अनुक्रमे 5 हजार 500 हून अधिक आणि 225 हून अधिकची भर पडली. लॉकडाऊनचे पाऊल उचलले नसते तर देशातील करोनाबाधितांची संख्या 15 एप्रिलपर्यंत 8 लाखांवर गेली असती, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. त्या अंदाजाशी वैद्यकीय तज्ञांनीही सहमती दर्शवली आहे.