विस्कळीत नियोजनाचा फटका
पुणे – पावसाचा पुरेसा जोर नसल्याने खडकवासला प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नसतानाही गेल्या 10 दिवसांत खडकवासला धरण 50 टक्के रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाही जलसंपदा विभागाकडून धरणसाठ्याचे विस्कळीत नियोजन केले जात असल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षी अशाच प्रकारे परतीचा पाऊस होईल, या भरवशावर मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. संपूर्ण वर्षभर शहर आणि ग्रामीण भागात वाद पाहायला मिळाले. शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ही धरणे कधी भरणार याकडे शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष असते. यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाले. ज्या आठवड्यांमध्ये मागील वर्षी धरण पूर्ण भरले होते. त्यापेक्षा उशिरा धरण 100 टक्के भरले.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. 16 जुलैला खडकवासला धरण 100 टक्के भरले. त्यामुळे खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यात आले. तसेच कालव्यातूनही पाणी सोडण्यात येत आहे.
16 जुलै रोजी खडकवासला धरणात 1.93 टीएमसी म्हणजे 97.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध होते. आता धरणात 1.13 टीएमसी म्हणजे 57 टक्के पाणीसाठा आहे. आता खडकवासला धरणातील पाणीसाठा पुन्हा निम्म्यावर आणला आहे. खडकवासला धरणातून कॅनॉलद्वारे 1005 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक असताना जलसंपदा विभागाने खडकवासला धरण 50 टक्के रिकामे केले आहे.
मागील वर्षीच्या अनुभवावरूनही शिकवण नाही
मागील वर्षी सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे 100 टक्के भरली. पावसाचा जोर कायम राहिल्याने खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी इतके पाणी नदीत सोडण्यात आले. त्यानंतर परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले. तर ग्रामीण भागात शेतीलाही कमी पाणी सोडण्यात आले. मागील वर्षीचा हा अनुभव लक्षात घेता जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाणी धरणात राखून ठेवणे आवश्यक आहे.