नसरूद्दिन शाह, शबाना आझमी यांच्यासह 100 मुस्लिम मान्यवरांचे निवेदन
नवी दिल्ली : अयोध्येतील वाद जीवंत ठेवणे हे समाजासाठी हानीकारक असल्याचे सांगत देशातील नामवंत 100 मुस्लीमांनी सोमवारी आयोध्या प्रकरणावर फेरविचार याचिका दाखल करण्यास विरोध दर्शवला आहे. या मान्यवरांमध्ये चित्रपट अभिनेते नसरूद्दीन शहा आणि शबाना आझमी यांचा समावेश आहे.
या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मुस्लीम समाजातील बुध्दीवादी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, व्यावसायिक, कवी, अभिनेते , चित्रपट निर्माते आणि नाट्यक्षेत्राशी संबंधित लोकांचा समावेश आहे. अयोध्या निर्णयात श्रध्देवर अधिक विश्वास ठेवला गेला, याबद्दल मुस्लिम समाज, घटना तज्ज्ञ आणि समाजवादी संघटनांच्या वतीने आम्ही खेद व्यक्त करतो.
न्यायलयाचे आदेश हे न्यायिक चूक असल्याचे मान्य केले तरी अयोध्येचा वाद चिघळत ठेवणे हे भारतीय मुस्लिम समाजाचे नुकसान करणारे आहे. त्यातून काहीही हाती लागणार नाही, असे या निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर शाह, अझमी, चित्रपट लेखक अंजुम राजबली, पत्रकार जावेद आनंद आदी नामवंताच्या स्वाक्षरी आहेत.
सर्वोच्च न्यायलयाने वादग्रस्त वास्तूच्या जागेवरील 2.77 एकर जागा यातील एक पक्षकार रामलल्ला यांना देण्याचा निर्णय दिला. तसेच मशीद उभारण्यासाठी आयोध्येत पाच एकर जमीन देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मौलाना अर्शद मदानी यांच्या नेतृत्वाखालील जमात अलेमा ए हिंद यांनी 17 नोव्हेंबर रोजी आयोध्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याची घोषणा केली होती.