रंगिया / गोवाहटी: आसाममधील कामरुप जिल्ह्यातील एका कोविड देखभाल केंद्रातील सुमारे 100 करोनाबाधित रुग्ण आज अन्न आणि पाण्याच्या योग्य व्यवस्थेसाठी या केंद्रातून बाहेर राष्ट्रीय महामार्ग 31 वर आंदोलन करायला लागले.
या रुग्णांनी आपल्या मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक रोखून धरली. या प्रकाराची माहिती समजताच कामरुप जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी कैलास कार्तिक आणि पोलीस चांगसारी येथील कोविड केंद्रावर रवाना झाले. त्यांनी सर्व रुग्णांना महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्याची आणि पुन्हा कोविड केंद्रामध्ये जाण्याची सूचना केली.
रुग्ण कोविड केंद्रात परत गेल्यावरच चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला जाऊ शकेल, असे या अधिकाऱ्यांनी रुग्णांना सांगितले.
रुग्ण कोविड केंद्रातून बाहेर पडून आंदोलन करायला लागल्यामुळे या परिसरातील वातावरणात अचानक तणाव निर्माण झाला. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे रुग्ण परत कोविड केंद्रामध्ये गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कोविड केंद्रामध्ये आपल्याला अन्न, पाणी दिले जात नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. रुग्णांसाठीच्या बिछान्यांचीही व्यवस्था योग्यप्रकारे नाही. एकाच खोलीमध्ये 10-12 जणांना दाटीवाटीने रहायला लागत असल्याचेही रुग्णांनी सांगितले. रुग्णांची असुविधा लगेच दूर करण्यात येईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जर रुग्णांना कोविड केंद्रांमध्ये असुविधा वाटत असेल, तर त्यांनी गृहविलगीकरणात रहावे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हिमांता बिस्वा शर्मा यांनी केली आहे.