कामशेत (वार्ताहर) – लॉकडाऊनच्या काळात गरीब, गरजू नागरिक, कामगार, मजूर उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी हा उपक्रम राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कामशेतमध्ये नुकतेच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रोज 100 थाळी जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद झाल्याने हातावर पोट भरणाऱ्या गरीब कामगार, मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा नागरिकांना या शिवभोजन थाळीचा लाभ होणार आहे. केवळ पाच रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळत असल्याने गरजू लोक या शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत. तसेच पगारापासून वंचित असलेल्या होमगार्ड यांना काम असून, देखील उपासमारीची वेळ आली, त्यांना या शिवभोजन थाळीचा आधार मिळत आहे.
कामशेतसाठी उपलब्ध केलेल्या शिवभोजनाच्या 100 थाळ्या सध्या कमी पडत आहे, त्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे, असे शिवभोजन थाळी केंद्रचालक सविता साबळे यांनी सांगितले.