उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ः युपीएससी आणि एमपीएससी विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई : करोना विषाणूच्या संसर्गाने राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या दरम्यान होणाऱ्या परीक्षांच्या आयोजनावरही टांगती तलवार आहे. याचा फटका युपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसणार आहे.
विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती त्यांच्या इथून मागील मेहनतीवर पाणी पडणार आहे. याचाच विचार करून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर्षी परीक्षा न देऊ शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले आहे.
उदय सामंत म्हणाले, यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी एक वयोमर्यादा ठरलेली असते. मात्र राज्यात सुरू असलेल्या करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षा होणार की नाही याबद्दल साशंकता आहे. जर यावर्षी या परीक्षा रद्द झाल्या, तर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आहे. त्यांच्यावर अन्याय होईल. या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी परीक्षा देता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता यावी यासाठी त्यांची वयोमर्यादा 1 वर्ष वाढवून देणे आवश्यक आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करेल.
उदय सामंत यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत 1 वर्ष वाढ करण्याचा निर्णय झाल्यास हा मोठा दिलासा असणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन अनेक वर्षे सातत्याने अभ्यास करत असतात. त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात. अशावेळी त्यांच्यासाठी परीक्षेची प्रत्येक संधी महत्त्वाची असते. त्यामुळेच 1 वर्षाची मुदतवाढ मिळाल्यास असे विद्यार्थी पुढील वर्षी आपले भविष्य आजमावू शकणार आहेत.
महाविद्यालयीन परीक्षा होणारच
कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय होईल.
अगदीच करोनुाळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने महाविद्यालयीन परीक्षाही रद्द झाल्या अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले आहेत.