अहमदाबाद – गुजरातमध्ये सुमारे 1 लाख 30 हजार बालमजूर तेथील शेतात राबत आहेत, असा एक अहवाल अहमदाबादमधील एका स्वयंसेवी संघटनेने दिला आहे. यातील बहुतेक बालमजूर हे अदिवासी असून त्यांच्याकडून कापसाच्या शेतात मजुरी करून घेतली जात आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.
या स्वयंसेवी संघटनेने दिलेल्या अहवालाची नोंद कामगार मंत्रालयाने घेतली असून त्यांनी संबंधित ठिकाणी आपली पथके पाठवून या माहितीची खातरजमा करून घेण्याचा आदेश दिला आहे.
कापूस व कापसाच्या बियांना कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अत्यंत कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे त्यासाठी शेतात मजूर ठेवणे परवडत नसल्याने कमी किमतीत तेथे बालकांनाच मजुरीसाठी लावले जात आहे, असेही या संस्थेचे म्हणणे आहे.
या आदिवासी मुलांना दिवसभर काम केल्यानंतर केवळ दीडशे रुपयांची कमाल मजुरी दिली जाते. दहा वर्षापूर्वी सरकारने शेतात बालमजुरांना राबवून घेण्याच्या प्रकाराबद्दल कठोर उपाययोजना केल्यानंतर या कंपन्यांनी आपला मोर्चा बनसकांठा, साबरकांठा, अरवली, महिसागर आणि छोटा उदयपूर या जिल्ह्यांतील आदिवासी भागाकडे वळवला.
तेथे दक्षिण राजस्थानातून बालमजूर नेण्यात आले. दरम्यान, हा प्रकार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा गुजरातच्या मजूर विभागाने दिला आहे.